30/06/2026
मोठे फळ म्हणजेच चांगले फळ का?
जिममध्ये स्टेरॉईड घेऊन बनवलेली शरीरयष्टी आणि पारंपरिक पहलवानाची शरीरयष्टी यांची तुलना केली तर आपल्याला लगेच फरक समजतो. दोघांनीही मेहनत घेतलेली असते, पण एका ठिकाणी अतिरिक्त हस्तक्षेप असतो. त्यामुळे आपण पारंपरिक पहलवानाकडून स्टेरॉईडसारखी शरीरयष्टी अपेक्षित ठेवत नाही.
मग शेतीत हा विचार का बदलतो?
युरियाचे कृत्रिम संश्लेषण 1828 मध्ये झाले. त्यानंतर औद्योगिक उत्पादन सुरू झाले. भारतात हरित क्रांतीनंतर, विशेषतः 1960 ते 1970 च्या दशकात युरिया, डीएपी आणि उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला.
त्या काळी देशासमोर अन्नटंचाईचे मोठे संकट होते. त्यामुळे त्या तंत्रज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट होते कमी जमिनीत जास्त उत्पादन घेणे. चव, सुगंध, पौष्टिकता किंवा जैवविविधता ही त्यावेळची प्राथमिक उद्दिष्टे नव्हती. त्या काळासाठी ते अत्यंत आवश्यक आणि यशस्वी पाऊल होते.
यामुळे उत्पादन वाढले, फळांचा आकार वाढला आणि अन्नसुरक्षेला मोठा हातभार लागला. यात कोणताही वाद नाही.
पण एक प्रश्न विचारायला हरकत नाही.
आज बाजारात दिसणारा 120 ते 150 ग्रॅमचा टोमॅटो हेच नैसर्गिक मानक आहे का? की पूर्वी कमी बाह्य इनपुटमध्ये येणारा 80 ते 90 ग्रॅमचा टोमॅटो हा नैसर्गिक मानक होता?
जर स्टेरॉईडनंतरची शरीरयष्टी आपण नैसर्गिक मानक मानत नसू, तर हरित क्रांतीनंतर आधुनिक खत व्यवस्थापनामुळे वाढलेला फळांचा आकारच नैसर्गिक मानक का मानायचा?
माझ्या शेतावर एकाच जातीचे बियाणे, एकाच जमिनीत आणि एकाच हवामानात, फक्त पोषण व्यवस्थापन बदलून घेतलेल्या पिकांमध्ये मला सातत्याने एक गोष्ट जाणवली आहे. कमी किंवा शून्य रासायनिक खतांवर वाढवलेली फळे अधिक भरीव, अधिक डेन्स आणि चवीला अधिक गोड वाटतात. तर जास्त नायट्रोजनवर वाढलेली फळे आकाराने मोठी असली तरी काही वेळा अधिक पाणचट वाटतात.
हा माझा अनुभव आहे. पण विशेष म्हणजे काही वैज्ञानिक संशोधनांतही याच दिशेचे निष्कर्ष दिसून आले आहेत.
इटलीमध्ये 2022 मध्ये प्रक्रिया उद्योगासाठी घेतल्या जाणाऱ्या टोमॅटोवर केलेल्या संशोधनात नायट्रोजनचे प्रमाण वाढवल्यावर फळांचे वजन आणि उत्पादन वाढले. पण त्याचबरोबर Dry Matter, Soluble Solids (°Brix), Total Sugar Index आणि Vitamin C कमी झाल्याचे आढळले. संशोधकांनी निष्कर्ष काढला की जास्त उत्पादन आणि उत्तम गुणवत्ता यांच्यात संतुलन साधणारे नायट्रोजन व्यवस्थापन आवश्यक आहे.
दुसऱ्या एका संशोधनात नायट्रोजनचे एकूण प्रमाण समान ठेवले, पण त्याचा स्रोत बदलला. त्यात सेंद्रिय किंवा अमोनियम-प्रधान पोषणावर वाढलेल्या टोमॅटोना गोडवा, चव, आम्लता आणि एकूण स्वीकारार्हता यामध्ये जास्त गुण मिळाले, तर नायट्रेट-प्रधान पोषणातील टोमॅटो कमी गुण मिळाले.
आणखी एका अभ्यासात नायट्रोजनचे प्रमाण कमी केल्यावर उत्पादनात फारसा फरक पडला नाही, पण Dry Matter वाढले आणि Soluble Sugar 5 ते 17 टक्क्यांपर्यंत वाढली, त्यामुळे फळांची गुणवत्ता सुधारल्याचे दिसून आले.
याचा अर्थ असा नाही की रासायनिक शेती चुकीची आहे किंवा सेंद्रिय शेतीच योग्य आहे.
याचा अर्थ इतकाच की "मोठे" आणि "उत्तम" हे नेहमी समानार्थी शब्द नसतात.
मोठे घर म्हणजे सर्वोत्तम घरच असे नसते.
मोठी कार म्हणजे सर्वोत्तम कारच असे नसते.
जास्त स्नायू म्हणजेच जास्त ताकद असेही नसते.
त्याचप्रमाणे मोठे फळ म्हणजेच सर्वोत्तम फळ असेलच असे नाही.
म्हणून सेंद्रिय, नैसर्गिक आणि रासायनिक शेतीची तुलना करताना फक्त उत्पादनाचे किलो किंवा फळाचा आकार पाहून निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
तुलना करायचीच असेल तर Dry Matter, °Brix, चव, सुगंध, पोषकद्रव्ये, उत्पादन खर्च, साठवण क्षमता, मातीचे आरोग्य, पर्यावरणीय परिणाम आणि शेतकऱ्याचा नफा या सर्व बाबींचाही विचार झाला पाहिजे.
आज आपण जे "नॉर्मल" समजतो, ते खरोखर निसर्गाने दिलेले नॉर्मल आहे का, की मागील 60-70 वर्षांत आधुनिक शेतीने तयार केलेले नवीन नॉर्मल आहे?
कदाचित पुढचा प्रश्न "मोठे फळ कसे मिळेल?" हा नसून...
"उत्तम फळ म्हणजे नेमके काय?" हा असायला हवा.