AllGanic Farm

AllGanic Farm AllGanic Farm is a 100% Natural Fruits and Vegetables grower located at Ch. Sambhajinagar (Aurangabad), Maharashtra.
(4)

We also have Pure A2 Cow Milk Dairy Farm, Country (Gavran) Poultry Farm, Fish Farm, Ducks, Geese and Honeybees (Apiary).

26/05/2026

आजकाल बऱ्याच शहरी लोकांना शेतीकडे एक रोमँटिक कल्पना म्हणून पाहण्याची सवय झाली आहे.
कॉर्पोरेट नोकरीचा ताण, ट्रॅफिक, स्क्रीनसमोरचं आयुष्य, आणि सोशल मीडियावर दिसणारी हिरवीगार शेतं… ह्यामुळे शेती म्हणजे शांत, साधं आणि समाधानाचं जीवन अशी एक प्रतिमा तयार झाली आहे.

पण शेती ही “escape plan” नाही.
ती पूर्णवेळ जबाबदारी आहे.

हे समजून घेण्यासाठी मी काही वर्षांपूर्वी एक छोटासा प्रयोग केला होता.
त्याचं नाव होतं Tiny Farm Project.

माझ्याकडे असलेल्या अर्ध्या एकर शेताचे मी एक हजार स्क्वेअर फूटचे वीस तुकडे केले आणि ते शहरी लोकांना वापरायला दिले. कल्पना साधी होती. ज्यांना शेती करायची इच्छा आहे त्यांनी प्रत्यक्ष हात मातीला लावून बघावं.

यामध्ये दोन प्रकारच्या स्कीम होत्या.

पहिली होती Managed Farm.
यामध्ये संपूर्ण देखभाल आमची माणसं करणार. ग्राहकांनी फक्त येऊन भाज्या लावायच्या, पाणी द्यायचं, भाज्या तोडायच्या आणि अनुभव घ्यायचा.

दुसरी होती Self Managed Farm.
यामध्ये सर्व काम स्वतः करायचं. खुरपणी, मशागत, पाणी, निगा, सगळं.

सुरुवातीला चार-पाच फॅमिली खूप उत्साहाने आल्या.
फोटो काढले गेले. मुलांनी मातीमध्ये खेळलं. “Organic lifestyle” बद्दल चर्चा झाली.

पण दोन आठवड्यांत जवळपास सगळे गायब झाले.

शेवटी फक्त एकच फॅमिली टिकली. त्यांनी साधारण सहा महिने प्रयत्न केला. पण त्यातून फारसं काही निर्माण झालं नाही. हळूहळू मेंटेनन्स बंद पडलं आणि शेवटी त्यांनीही सोडून दिलं.

कारण शेती Instagram reel नाही.
ती रोजची पुनरावृत्ती आहे.

एक गुंठा खुरपणं सुद्धा वाटतं तेवढं सोपं नसतं.
दोन तास उन्हात काम केल्यानंतर शरीर काय असतं हे समजतं.
पाठीचा त्रास, हाताला फोड, अंगदुखी, जखमा… हे सगळं शेतीचा भाग आहे.

आज शेतकरी सतत “लेबर समस्या” बद्दल बोलतो.
पण खरी गोष्ट अशी आहे की शहरातून शेतीकडे वळणाऱ्या माणसाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा.

“मी स्वतः किती काम करू शकतो?”

कारण शेतीमध्ये फक्त management करून चालत नाही.
किमान सुरुवातीला तरी तुम्हाला प्रत्येक काम हाताने करता आलं पाहिजे.

आम्ही स्वतः हेच केलं.

रोपं तयार करण्यापासून खुरपणीपर्यंत…
भाजी काढण्यापासून ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत…
सगळं स्वतः करून पाहिलं.

आणि जेव्हा ठामपणे हे समजलं की “गरज पडली तर आपण काहीही करू शकतो”, तेव्हाच मोठी उडी मारली.

सुरुवातीचे काही महिने खूप कठीण गेले.
अंगदुखी आणि जखमांनी अक्षरशः बेजार झालो होतो.
पण एक गोष्ट लक्षात आली.

शेतीमध्ये शरीर आधी बदलतं.
नंतर मन बदलतं.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक वास्तव.

शेतीमध्ये stable income नसतं.
कधी भाव पडतो.
कधी पाऊस जातो.
कधी रोग येतो.
कधी उत्पादनच कमी येतं.

म्हणून मी शेतीमध्ये पूर्णवेळ उतरण्यापूर्वी एक corpus तयार केला आणि त्याची व्यवस्थित mutual funds मध्ये गुंतवणूक केली. आज त्यातून दरमहा नियमित cash flow येतो.

हे सांगण्याचं कारण एकच.

शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहणं शहरी माणसासाठी खूप कठीण असतं.
कारण शहरात राहताना आपल्या गरजा नकळत खूप वाढलेल्या असतात.

मॉलमध्ये जाणं.
बाहेर खाणं.
वारंवार shopping.
मुलांचे lifestyle expectations.
हे सगळं शेतीच्या अनिश्चित उत्पन्नाशी जुळत नाही.

आणि जेव्हा तुम्ही livestock घेता, तेव्हा खेळ पूर्णपणे बदलतो.

गाय, म्हैस, शेळ्या ह्या फक्त “assets” नसतात.
त्या जिवंत जबाबदाऱ्या असतात.

त्यांना रोज खायला लागतं.
रोज पाणी लागतं.
रोज काळजी लागते.

त्यामुळे तुम्ही शेताशी बांधले जाता.

त्यानंतर अचानक दोन दिवस बाहेर जाणंही कठीण होतं.
जोपर्यंत तुम्हाला अत्यंत विश्वासू माणूस मिळत नाही, तोपर्यंत livestock म्हणजे 24 तासांची commitment असते.

मला असं वाटतं की शेतीमध्ये येण्यापूर्वी प्रत्येक शहरी माणसाने स्वतःला तीन प्रश्न विचारायला हवेत.

पहिला.
मी प्रत्यक्ष शारीरिक काम करू शकतो का?

दुसरा.
मी काही वर्ष unstable income सहन करू शकतो का?

आणि तिसरा.
मी माझ्या lifestyle expectations कमी करू शकतो का?

जर ह्या तीन प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं “हो” असतील तर शेती खूप सुंदर प्रवास आहे.

नाहीतर शेती दूरूनच सुंदर दिसते.

26/05/2026

शेतीबद्दल चर्चा सुरू झाली की शेवटी विषय येऊन अडकतो तो बाजारभाव, हमीभाव आणि सरकारवर.

“कापसाला भाव नाही.” “सोयाबीन पडले.” “कांदा रस्त्यावर फेकावा लागला.”

पण खरं सांगायचं तर ही समस्या फक्त बाजाराची नाही. ही आपल्या शेतीच्या पद्धतीचीही आहे.

कारण आपण शेतीला शेती म्हणून कमी आणि जुगार म्हणून जास्त करायला लागलो आहोत.

संपूर्ण हंगाम… संपूर्ण जमीन… संपूर्ण पैसा… एका पिकावर.

मग त्या एका पिकाचा भाव पडला की संपूर्ण हंगाम कोसळतं.

व्यवसायात एक साधा नियम असतो — risk distribution.

शहाणा माणूस आयुष्यभराची सगळी कमाई एका शेअरमध्ये टाकत नाही. कारण त्याला माहिती असतं, जर तो शेअर पडला तर सगळंच संपेल.

म्हणून तो वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. थोडं सोनं, थोडी जमीन, काही शेअर्स, काही व्यवसाय.

पण शेतीमध्ये आपण नेमकं उलट करतो.

पूर्ण जमीन एका पिकाखाली टाकतो. पूर्ण वर्ष एका भावावर अवलंबून ठेवतो. आणि मग बाजारभावावर राग काढतो.

खरं म्हणजे ही शेतीची समस्या कमी आणि risk management ची समस्या जास्त आहे.

मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे जर शेतात विविध प्रकारची पिकं असतील, इंटरक्रॉपिंग असेल, भाजीपाला असेल, डाळी असतील, फळझाडं असतील, पशुपालन असेल, तर संपूर्ण चित्र बदलतं.

एखाद्या पिकाचा भाव पडेल. पण दुसऱ्याचा वाढेल.

एक पीक फसले तरी दुसरे उभे राहील. एका हंगामात तोटा झाला तरी दुसरा भरून काढेल.

म्हणजे शेती “एका भावावर” चालत नाही तर संपूर्ण सिस्टीमवर चालते.

आणि इथेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो — cash flow.

शेतकऱ्याची मोठी समस्या कमी उत्पन्न नसते. समस्या असते irregular income.

चार महिन्यात एकदाच पैसा येतो. तोही एकदम मोठा.

मग पुढचे वर्ष त्याच पैशावर जगायचं. बी-बियाणं, खतं, औषधं, घरखर्च, शिक्षण, दवाखाना… सगळं त्यातून.

म्हणजे शेती नफ्यात असली तरी cash flow तुटलेला असतो.

पण mixed farming मध्ये परिस्थिती बदलते.

दूध दररोज पैसा देतं. भाजीपाला आठवड्याला पैसा देतो. फळं, कडधान्यं, अंडी, प्रक्रिया केलेले पदार्थ वेगवेगळ्या काळात उत्पन्न देतात.

मग शेतकरी “एका दिवसाच्या पैशावर” जगत नाही. त्याच्या शेतातून सतत छोटे छोटे income streams चालू राहतात.

आणि खरं आर्थिक स्थैर्य तिथेच निर्माण होतं.

निसर्गाकडे बघितलं तरी तो कधी monocrop करत नाही. जंगलात हजारो प्रकारची झाडं एकत्र वाढतात. म्हणून जंगल स्थिर राहतं.

आपण मात्र शेकडो एकरात एकच पीक लावून स्थिरता शोधतो.

कदाचित म्हणूनच आज शेतीत उत्पादन वाढलं… पण शांतता कमी झाली.

पूर्वी कमी उत्पादन होतं. पण शेतकरी बाजारावर इतका अवलंबून नव्हता.

आज आपण स्वतः अन्न पिकवतो… पण डाळ, तेल, भाजी, फळं, दूध सगळं बाजारातून विकत घेतो.

म्हणजे अन्नदाता स्वतःच बाजाराचा सर्वात मोठा ग्राहक बनला.

शेतीचा खरा विमा सरकारचा हमीभाव नाही. तर शेतातील विविधता आहे.

ज्या दिवशी शेतकरी “एका पिकातून श्रीमंत होण्याचं” स्वप्न सोडून “सतत पैसे देणारी सिस्टीम” उभी करेल, त्या दिवशी बाजारभावाचं महत्त्व आपोआप कमी होईल.

कारण मग प्रश्न असा राहणार नाही की, “या पिकाला भाव किती आहे?”

प्रश्न असा असेल, “माझ्या शेतातून वर्षभर किती वेगवेगळे उत्पन्नाचे प्रवाह चालू आहेत?”

26/05/2026

शेतकऱ्याची सर्वात मोठी शोकांतिका कोणती माहिती आहे?

तो जगाला खाऊ घालतो… पण स्वतःच्या घरासाठी पिकवत नाही.

आजकाल बरेच लोक आमच्या फॉर्मवर येतात. डोळ्यांत मोठी स्वप्नं असतात.

कोणी म्हणतो, “शेवगा करायचा आहे. पानांच्या पावडरला खूप मार्केट आहे.”

मी शांतपणे विचारतो, “मागच्या वर्षात तुम्ही स्वतः किती वेळा शेवग्याची पावडर खाल्ली?”

मग दुसरा प्रश्न.

“तुमच्या ५० नातेवाईकांमध्ये रोज शेवग्याची पावडर खाणारे पाच लोक सांगा.”

माणूस थांबतो.

कारण उत्तर त्यालाही माहिती असते.

आपण आज अशी शेती करू पाहतोय ज्याचा ग्राहक आपण स्वतः नाही. ज्याची चव आपल्याला माहिती नाही. ज्याची गरज आपल्या घराला नाही.

शेती आता पोटासाठी राहिलेली नाही. ती फक्त बाजारासाठी उरली आहे.

पूर्वी शेतकरी गरीब असायचा. पण त्याच्या घरात अन्न श्रीमंत असायचं.

कोठारात ज्वारी असायची. बाजरी असायची. तुरीची डाळ असायची. मूग, मटकी, चवळी असायची. घरामागे भाजीपाला असायचा. दारी दोन गाई असायच्या. झाडावरून तोडून खाता येतील अशी पेरू, सीताफळ, आंबे असायचे.

आणि आज?

शेतकरी कापूस विकतो… आणि त्या पैशातून किराणा दुकानातून डाळ विकत घेतो.

सोयाबीन विकतो… आणि मुलासाठी दूध पिशवीत आणतो.

द्राक्षे export करतो… आणि घरातली मुलं सफरचंद फोटोमध्ये बघतात.

हे फक्त आर्थिक अपयश नाही. ही विचारांची गुलामी आहे.

आपण बाजारावर इतके अवलंबून झालो आहोत की आता स्वतःच्या जमिनीवर स्वतःचे अन्न पिकवण्याची कल्पनाच मागास वाटायला लागली आहे.

खरंतर प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा.

“जर उद्यापासून बाजार बंद झाला… तर माझ्या शेतात माझ्या घरासाठी काय उगवतं?”

उत्तर भीतीदायक आहे.

आज लाखो रुपयांची शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या घरात:

शुद्ध दूध नाही

रासायनिक फवारणीशिवाय भाजी नाही

स्वतःची डाळ नाही

स्वतःची फळं नाहीत

आणि गंमत म्हणजे हे बोलताना मी कुठलं तत्त्वज्ञान सांगत नाही.

मी स्वतः शहरातून शेतीत आलो आहे.
माझ्याकडे खानदानी शेतीचा वारसा नव्हता.
पण आज माझ्या शेतात तूर, मूग, उडीद, चवळी, मटकी उगवते.
चोवीस प्रकारच्या भाज्या आणि अडतीस प्रकारची फळं आहेत.
दूध, तूप, लोणी, ताक, दही घरचं आहे.
वाटेल तेव्हा अंडी खाता येतात आणि वाटेल तेव्हा कोंबडी पकडून चिकन करता येतं.

हे मी श्रीमंती दाखवण्यासाठी सांगत नाही.
हे तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात सर्वात आधी असायला हवं.

मग प्रश्न पडतो…

जर शहरातून आलेला माणूस हे करू शकतो,
तर खानदानी शेतकरी का नाही?

आणि मग आपण म्हणतो, “शेती परवडत नाही.”

शेती परवडत नाही की आपण जगणंच चुकीचं निवडलंय?

हिशोब अगदी साधा आहे.

आठवड्याला:

पाचशे रुपयांची भाजी

दोन-तीनशे रुपयांची फळं

रोजचं दूध

अंडी

किराणा

वर्षभरात लाखाच्या आसपास पैसा फक्त जगण्यासाठी खर्च होतो.

आणि गंमत म्हणजे हे सगळं उत्पादन शेतकरी स्वतः करू शकतो.

पाणी कमी असलं तरी घरापुरती भाजी होते. पाच झाडं जगवायला आकाश फाटत नाही. दोन गाईंसाठी चारा उगवतो. दहा कोंबड्या पाळायला उद्योग लागत नाही.

पण प्रश्न संसाधनांचा नाही. प्रश्न मनाचा आहे.

आपल्याला आता “उगवलेलं” अन्न खायची सवय राहिलेली नाही. आपल्याला “खरेदी केलेलं” अन्नच सुरक्षित वाटायला लागलंय.

समजा एखादा शेतकरी पाच एकर कापूस करतो. सगळा खर्च जाऊन तीस हजार रुपये एकरी उरतात. म्हणजे दीड लाख.

आता त्याने फक्त अर्धा एकर स्वतःसाठी बाजूला ठेवला तर?

पाच गुंठे फळबाग

तीन गुंठे भाजीपाला

दहा गुंठे चारा

दोन गाई

काही कोंबड्या

काही शेळ्या

वरवर पाहता तो वीस-पंचवीस हजारांचं उत्पन्न कमी करतोय.

पण प्रत्यक्षात?

तो:

मुलांचं पोषण विकत घेणं बंद करतोय

बाजाराची भीक मागणं बंद करतोय

औषधांवरचा खर्च कमी करतोय

जमिनीची ताकद परत वाढवतोय

आणि सर्वात महत्त्वाचं…

तो पुन्हा “शेतकरी” बनतोय.

कारण शेतकरी म्हणजे फक्त माल विकणारा माणूस नाही. शेतकरी म्हणजे स्वतःच्या जमिनीवर स्वतःच्या कुटुंबासाठी जीवन उगवणारा माणूस.

बाकी सगळं व्यापार आहे.

25/05/2026

शेतीत अजूनही बहुतेक लोक “एका पिकातून किती पैसा आला” हे मोजतात. पण खरी गणितं तिथेच चुकतात.
आता मोजमाप बदलण्याची वेळ आली आहे.

“प्रति एकर उत्पन्न” पेक्षा “प्रति एकर प्रति महिना उत्पन्न” हे जास्त महत्त्वाचं आहे.

कारण जमीन मर्यादित असते, पण वेळ ही सुद्धा तितकीच महत्त्वाची संपत्ती आहे.

उदाहरणार्थ, एका एकर गव्हासाठी मशागत, पेरणी, बियाणं, खतं, फवारणी धरून साधारण २० हजार रुपये खर्च आला असे धरू.
उत्पन्न १२ ते १५ क्विंटल.
भाव २५०० रुपये.

म्हणजे एकूण उत्पन्न साधारण ३० ते ३७ हजार रुपये.

खर्च वजा केला तर हातात उरले १० ते १७ हजार रुपये.

पण इथे एक प्रश्न विचारला जात नाही.
ही जमीन किती महिने अडकून होती?

गहू साधारण ४ ते ५ महिने शेतात राहतो.
म्हणजे प्रत्यक्षात त्या जमिनीने तुम्हाला “प्रति महिना” फक्त २ ते ४ हजार रुपये दिले.

आता हेच गणित प्रत्येक पिकाला लावा.

ऊस एकरी लाख देतो म्हणतात. पण तो १२ ते १८ महिने जमीन अडवतो.
कापूस पैसे देतो, पण सहा-सात महिने शेत व्यापून बसतो.

मग खरी कमाई कोणत्या पिकात आहे?

माझ्या मते मूग हे अशा पिकांपैकी एक आहे जे “प्रति एकर प्रति महिना उत्पन्न” या गणितात खूप पुढे आहे.

मूगाचं उत्पादन कदाचित उसाइतकं मोठं दिसणार नाही.
पण मूग फक्त ६० ते ७० दिवसांत तयार होतं.

समजा ३ क्विंटल उत्पादन आलं आणि भाव ७००० रुपये मिळाला.
म्हणजे साधारण २१ हजार रुपये gross income.

खर्च कमी असल्यामुळे १५ ते १७ हजार रुपये हातात राहू शकतात.

आता हे दोन महिन्यांनी भागा.

म्हणजे मूग अनेक मोठ्या पिकांपेक्षा जास्त “प्रति एकर प्रति महिना उत्पन्न” देतं.

आणि म्हणूनच तुरीमध्ये मूग, बाजरीमध्ये मूग, किंवा पाच फुटी उसामध्ये सुरुवातीला मूग, उडीद, भाजीपाला घेणं हे फक्त intercropping नाही, तर intelligent cash flow management आहे.

ऊस अजून लहान असताना जमीन रिकामी पडत नाही.
तूर वाढायला वेळ घेत असताना मूग आधी पैसे देऊन जातं.
बाजरीसोबत मूग घेतल्यावर nitrogen cycle सुधारते, जोखीम कमी होते आणि सुरुवातीपासून cash flow चालू होतो.

अशा पद्धतीने विचार केला तर “ठोकमाल” पिकांचं गणित वेगळंच दिसायला लागतं.

एकदाच मोठे पैसे देणारे पीक आणि सतत cash flow देणारे पीक यात खूप फरक आहे.

कारण शेतीमध्ये फक्त अंतिम उत्पादन महत्त्वाचं नसतं.
Cash flow किती वेळा येतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं.

आणि इथेच भाजीपाल्याची खरी ताकद सुरू होते.

माझ्या मते सध्या “प्रति एकर प्रति महिना उत्पन्न” या गणितात भाजीपाला सर्वात पुढे आहे.

कारण भाजीपाला फक्त उत्पादन देत नाही, तो “वेळ” विकतो.

मेथी २१ दिवसांत निघून जाते.
कोथिंबीर, पालक, मुळा ४० ते ४५ दिवसांत हातात येतात.
म्हणजे तीच जमीन वर्षभर अनेक वेळा कमाई करून देते.

आमच्या शेतात एका बेडवर सहा पिकं असतात.

दोन वांग्यांच्या मध्ये मुळा.
बेडच्या सेंटरला मका.
बाजूला चवळी.
दर सहा फुटावर हादग्याचं झाड.
आणि त्या हादग्यावर एक वेल.

हे फक्त “मिक्स क्रॉपिंग” नाही.
हे वेळ, सूर्यप्रकाश, मुळांची खोली आणि जागेचा पूर्ण वापर आहे.

२१ दिवसांत मेथी बाहेर.
४५ दिवसांत मुळा बाहेर.
५५ व्या दिवसापासून वेल आणि चवळी सुरू.
९० दिवसांत मका हातात.
१२० दिवसांनी वांगी चालू.

तोपर्यंत जवळजवळ वेल सोडून बाकी सगळी पिकं निघून गेलेली असतात.

आणि शेवटी काही महिन्यांनी वेलही काढून टाकायची.
मग पूर्ण बेडमध्ये फक्त वांगं राजासारखं उभं राहतं.

अशा अनेक मॉडेल्स आम्ही उभ्या केल्या आहेत.

फळबागेमध्ये सुरुवातीला पपई आणि डांगर घेऊन आधी उत्पन्न मिळवायचं.
जोपर्यंत मुख्य फळपीक तयार होत नाही तोपर्यंत जमीन रिकामी ठेवायची नाही.

डांगरातून biomass तयार होतं.
त्याचं मल्चिंग होतं.
माती थंड राहते.
तण कमी होतं.
पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

म्हणजे एकाच मॉडेलमधून:

सुरुवातीचं उत्पन्न

माती सुधारणा

मल्चिंग

moisture retention

आणि future orchard support

हे सगळं एकाच वेळी घडतं.

ही फक्त शेती नाही.
हे ecological engineering आहे.

कारण निसर्गात रिकामी जागा नसते.
रिकामी जमीन, रिकामा सूर्यप्रकाश आणि रिकामा वेळ हा निसर्गाचा स्वभाव नाही.

जंगलात कधीच एकच पीक नसतं.
कोणी पटकन वाढतं.
कोणी उंच जातं.
कोणी nitrogen fix करतं.
कोणी सावली वापरतं.
कोणी सुरुवातीला cash flow देतं तर कोणी दीर्घकाळ उत्पादन देतं.

निसर्ग layered असतो.
शेतीनेही पुन्हा layered व्हायला हवं.

आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण “रिकामी जमीन” आणि “रिकामा वेळ” याची किंमत मोजत नाही.

शेतात सूर्यप्रकाश पडतो आहे, पाणी वापरलं जातंय, माती जिवंत आहे, पण जमीन महिनोनमहिने एका पिकासाठी hold करून ठेवली जाते.

ही आर्थिक चूक आहे.

भविष्यात जिंकणारा शेतकरी तोच असेल जो:

फक्त क्विंटल मोजणार नाही

प्रति एकर प्रति महिना उत्पन्न मोजेल

cash flow frequency पाहील

sunlight capture वाढवेल

soil biology जिवंत ठेवेल

आणि एका पिकाऐवजी पूर्ण ecosystem उभं करेल

कारण शेवटी प्रश्न फक्त “एकराला किती मिळाले?” हा नसतो.

प्रश्न असतो
“त्या एकराने वर्षभर किती वेळा कमाई करून दिली?”

25/05/2026

गावरान : शब्द की वैज्ञानिक फसवणूक?

आज “गावरान” हा शब्द इतका फॅशनमध्ये आला आहे की लोकं आता वस्तूची गुणवत्ता बघत नाहीत, फक्त लेबल बघतात.

गावरान गूळ. गावरान चहा. गावरान अंडी. अस्सल गावरान तूप. गावरान टोमॅटो.

आणि “अस्सल गावरान” लिहिलं की किंमत दुप्पट.

पण प्रश्न असा आहे की गावरान म्हणजे नेमकं काय?

काही लोकांच्या मते रसायन न वापरता घेतलेलं म्हणजे गावरान. काहींना वाटतं जुन्या बिया म्हणजे गावरान. काहींना वाटतं कमी उत्पादन देणारी जात म्हणजे गावरान. तर काहींना फक्त गावातलं दिसलं की गावरान.

प्रत्यक्षात “गावरान” ही कोणती वैज्ञानिक व्याख्या नाही.

आणि हाच आपल्या शेतीचा मोठा गोंधळ झाला आहे.

आपल्या पूर्वजांनी गायींवर प्रचंड अभ्यासपूर्ण काम केलं. निवडक बैल वापरले जात होते. कळप जपले जात होते. इनब्रीडिंग टाळलं जात होतं. म्हणूनच भारताला “दुधाच्या नद्या वाहणारा देश” म्हटलं जायचं.

आजचा शेतकरी काय म्हणतो?

“डॉक्टर, गाय भरून द्या.”

बस्स.

कुठला बैल? कुठलं सीमेन? कुठली जनुके? दूधक्षमता किती? पुढच्या पिढीत काय उतरणार?

काहीच विचार नाही.

स्वतःच्या चांगल्या कालवडी तयार करायच्या नाहीत. बैल उभे करायचे नाहीत. कळप सुधारायचा नाही. मग आपल्या गाई दीड-दोन लिटरवर येणार नाहीत तर काय होणार?

आणि गंमत म्हणजे आपल्याकडून गीरसारख्या गाई ब्राझीलमध्ये गेल्या की तिथे त्या रेकॉर्डब्रेक दूध देतात. कारण त्यांनी गाईंची पूजा नाही केली, संशोधन केलं. डेटा ठेवला. निवडक प्रजनन केलं. सतत सुधारणा केली.

कोंबड्यांमध्येही हेच.

जगभरात पोल्ट्री जेनेटिक्सवर प्रचंड संशोधन चालतं. कमी खाद्यात जास्त वजन, अधिक अंडी, जास्त रोगप्रतिकारक क्षमता, उष्णता सहनशक्ती, यासाठी नवीन ब्रीड तयार केल्या जातात.

आपल्याकडे मात्र “गावरान कोंबडी” म्हटलं की चर्चा संपते.

ती नेमकी कोणत्या ब्रीडची आहे? उत्पादन किती? खाद्य रूपांतरण किती? वैज्ञानिक निवड झाली आहे का?

काहीच प्रश्न नाहीत.

भाजीपाल्यात तर अजून विचित्र प्रकार आहे.

टोमॅटो, बटाटा, मिरची, फ्लॉवर, कोबी ही मूळ भारतीय पिकंच नाहीत. मग “गावरान टोमॅटो” म्हणजे नेमकं काय?

अनेकदा फक्त हायब्रिड नसलेलं काहीही “गावरान” म्हणून विकलं जातं.

सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे “गावरान” या शब्दाने संशोधनाविषयी संशय निर्माण केला. सुधारणा म्हणजे वाईट आणि जुनं म्हणजे पवित्र, अशी मानसिकता तयार झाली.

पण खरं वास्तव उलट आहे.

आजचा गहू, ऊस, फळं, भाजीपाला, कोंबड्या, गाई, काहीच मूळ स्वरूपात नाही. हजारो वर्षांच्या निवडक प्रजननाने आणि सुधारणांनी ते इथपर्यंत आले आहेत.

माणसाची संपूर्ण प्रगती ही सुधारित जातींवर उभी आहे.

गावरान जपण्यात काहीच गैर नाही. पण सुधारणा थांबवून गावरानाची पूजा करणे, ही प्रगतीची हत्या आहे.

जग विज्ञानावर भविष्य उभारत आहे. आणि आपण अजूनही “अस्सल गावरान”च्या फलकाखाली भावनांची विक्री करत बसलो आहोत.

25/05/2026

जग नश्वर आहे हे समजल्यावर…

“सगळं क्षणभंगुर आहे” हे वाक्य आपण खूप सहज बोलतो.
पण खरंच एक दिवस ते आतपर्यंत समजलं, तर माणूस बदलतो.

कारण मग आयुष्याकडे बघायची नजर बदलते.

भारतीय तत्त्वज्ञानात हजारो वर्षांपासून एक गोष्ट वारंवार सांगितली गेली आहे.
बौद्ध तत्त्वज्ञान त्याला “अनित्य” म्हणतं.
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बदल हा जगाचा नियम आहे.
संत तुकाराम म्हणतात:

“येणेचि जन्मे मरण निश्चित”

म्हणजे जे जन्माला आलंय ते एक दिवस जाणारच.
शरीर, पैसा, सत्ता, प्रतिष्ठा, नाती… काहीही कायमचं नाही.

पण गंमत अशी आहे की हे माहिती असूनही माणूस असं जगतो जणू तो कायम इथेच राहणार आहे.

पूर्वी मला वाटायचं की अजून थोडं कमावलं, अजून थोडं मोठं झालो, अजून थोडं स्थिर झालो की मग मनासारखं जगता येईल.
पण हे “अजून थोडं” कधीच संपत नाही हे हळूहळू लक्षात आलं.

२१ व्या वर्षी काही गोष्टी करिअरसाठी सोडल्या.
२५ व्या वर्षी वाटलं आता कुटुंब महत्त्वाचं.
३० व्या वर्षी मुलांसाठी अनेक गोष्टी बाजूला ठेवल्या.
आणि अचानक जाणवलं, आपण थांबलो नाही तर ४० व्या वर्षीही कोणत्या ना कोणत्या कारणासाठी स्वतःलाच पुढे ढकलत राहणार.

माणूस जगत कमी आणि तयारीच जास्त करत राहतो.

विशेषतः पैसा.
पैसा आवश्यक आहे, यात वाद नाही.
पण एका टप्प्यानंतर पैसा गरज राहत नाही, तो सवय बनतो.
आणि नंतर खेळ.

मग प्रश्न “किती पुरे?” हा राहतच नाही.

जगातल्या सर्वात श्रीमंत माणसालाही थांबता येत नाही, कारण भूक पैशाची नसते, ती सतत मोठं होत राहण्याची असते.

पण शेवटी माणूस स्वतःलाच विचारतो: हे सगळं करून नेमकं मिळालं काय?

शेतीत काम करताना ही गोष्ट जास्त स्पष्ट दिसायला लागली.

कारण शेती माणसाला नश्वरता रोज दाखवत असते.

आज छान दिसणारं पीक उद्या रोगाने जाऊ शकतं.
एका पावसाने वर्षभराचं गणित बदलू शकतं.
कधी बाजार साथ देतो, कधी पूर्णपणे उलटा जातो.

शेतीत एक गोष्ट लवकर समजते: आपण फक्त प्रयत्न करू शकतो. सगळं आपल्या नियंत्रणात नसतं.

आणि कदाचित म्हणूनच निसर्गाच्या जवळ राहणारा माणूस थोडा शांत होत जातो.

झाडाला काही घाई नसते.
नदी स्वतःची जाहिरात करत नाही.
मातीला प्रतिष्ठेची गरज नसते.

फक्त माणूस सतत धावत राहतो.

मोठं घर, मोठी गाडी, जास्त पैसा, जास्त ओळख…
पण त्या धावण्यात तो स्वतःलाच मागे टाकतो.

ऑरगॅनिक शेती करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.
जमिनीवर सतत रासायनिक ताण देऊन काही काळ जास्त उत्पादन घेता येतं.
पण त्याची किंमत माती चुकवत असते.

माणसाचंही तसंच आहे.

सतत काम, सतत ताण, सतत धावपळ करून पैसा वाढवता येईल.
पण आतली शांतता हरवत जाते.

म्हणून मी सदतीसाव्या वर्षी आयटी क्षेत्रातून बाहेर पडलो आणि शेतीत आलो.

बाहेरून पाहणाऱ्या अनेकांना तो निर्णय वेडेपणाचा वाटला.
कारण आजच्या जगात सगळे शहराकडे धावत आहेत, आणि मी उलट दिशेने निघालो होतो.

पण काही निर्णय हे गणिताने घेतले जात नाहीत.
ते आतून घ्यावे लागतात.

आता त्रेचाळीसाव्या वर्षी कधी मोटरसायकल घेऊन निवांत फिरतो, कधी शेतात तासन्‌तास बसतो, कधी माती हातात घेऊन पिकं बघत राहतो…
आणि गंमत म्हणजे, पूर्वीपेक्षा कमी धावपळ असूनही आयुष्य जास्त भरलेलं वाटतं.

उपनिषदांमध्ये एक ओळ आहे: “तेन त्यक्तेन भुञ्जीथा”

म्हणजे त्यागाची जाणीव ठेवून उपभोग घ्या.
वस्तू वापरा, पण त्यांच्यात हरवू नका.

कदाचित हाच खरा अध्यात्माचा अर्थ असावा.
सगळं सोडून जंगलात जाणं नाही.
तर हे समजणं की काहीही कायमचं नाही, म्हणून हव्यासाने स्वतःला जाळण्यात अर्थ नाही.

म्हणून आता वाटतं, आयुष्यात पैसा कमावणं एवढंच महत्त्वाचं नाही.
कुठे थांबायचं हे कळणं जास्त महत्त्वाचं आहे.

कारण शेवटी:

शरीर थांबणार

पैसा इथेच राहणार

नाव विसरलं जाणार

आणि आपण ज्यासाठी इतकं धावलो, त्यातलं बहुतांश काही कायमचं नसणार

मग निदान एवढं तरी व्हायला हवं की एक दिवस मागे वळून बघताना असं वाटावं:

“हो… मी फक्त कमावलं नाही, थोडं जगलोही.”

25/05/2026

आज अनेकदा लोक विचारतात:

“तू ब्राह्मण असून चिकन कसं खातोस?” “तू ब्राह्मण असून कोंबडी पालन कसं करतोस?”

पण मला नेहमी वाटतं की हा प्रश्न आहारापेक्षा जास्त ओळखीबद्दल असतो.

कारण जर प्रामाणिकपणे वास्तवाकडे पाहिलं, तर आजचा समाज हजारो वर्षांपूर्वीच्या वर्णव्यवस्थेनुसार जगत नाही. पूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या कल्पना कर्मांशी जोडल्या गेल्या असतील. पण आज वास्तव पूर्ण बदललं आहे.

आज स्वतःला ब्राह्मण म्हणवणाऱ्या बहुतेक लोकांना:

वेद माहिती नाहीत,

पूजा सांगता येत नाही,

त्यांचा व्यवसाय अध्यापन किंवा भिक्षुकी नाही.

ते इंजिनिअर आहेत, डॉक्टर आहेत, उद्योग करतात, आयटीमध्ये काम करतात. आणि त्यात काही चुकीचं नाही.

मग प्रश्न असा आहे: जर कर्म बदललं, जीवनपद्धती बदलली, व्यवसाय बदलले, तर फक्त खानपानाचे नियमच जुन्या चौकटीत का ठेवायचे?

खरं पाहिलं तर शेती करणाऱ्या माणसाला जीवन वेगळ्या पद्धतीने समजू लागतं. कारण तो निसर्गाच्या मध्यभागी जगत असतो.

मानवाच्या सुरुवातीच्या इतिहासात “शाकाहार की मांसाहार?” हा नैतिक प्रश्न नव्हता. प्रश्न फक्त एवढाच होता: “आज खायला मिळणार काय?”

मग शेती आली. शेतीने माणसाला स्थैर्य दिलं. आणि पहिल्यांदाच “निवड” दिली.

तेव्हाच:

काय खावं,

काय टाळावं,

काय पवित्र,

काय अपवित्र

या कल्पना निर्माण होऊ लागल्या.

पण निसर्ग अजूनही तसाच आहे.

निसर्गात प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर जगतो.

शेती करणारा माणूस हे रोज पाहतो.

गांडुळे आहेत म्हणून माती जिवंत आहे. मधमाश्या आहेत म्हणून परागीभवन आहे. किडे आहेत म्हणून पक्षी आहेत. सूक्ष्मजीव आहेत म्हणून अन्न उगवतं.

म्हणून “जीवो जीवस्य जीवनम्” हे शेतकऱ्यासाठी तत्त्वज्ञान नसून वास्तव असतं.

मी गाईंना निकृष्ट चारा घालून, वासरांचं दूध तोडून त्यांचं दूध ओरबाडून घेत नाही.

मी कोंबड्यांना एका स्क्वेअर फुटात घुसमटून पाळत नाही.

मी शेळ्यांकडे चालता बोलता मटणाचा गोळा म्हणून पाहत नाही.

माझ्यासाठी हे फक्त उत्पादन नाहीत. हे सजीव आहेत.

माझ्या शेतामध्ये किडा-मुंग्यांपासून पक्ष्यांपर्यंत आणि सूक्ष्मजीवांपासून प्राण्यांपर्यंत प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचं अन्न आहे.

कारण निसर्ग फक्त माणसासाठी बनलेला नाही.

पण आधुनिक माणसाला असं वाटायला लागलं आहे की पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठीच आहे.

मग तो:

विषारी फवारण्या करतो,

लाखो जीव मारून टाकतो,

मातीतील सूक्ष्मजीव नष्ट करतो,

पक्षी, किडे आणि परागीभवन करणारे जीव संपवतो,

आणि मग त्याच जमिनीवर उगवलेलं अन्न “शुद्ध” म्हणून खातो.

ही खरी विडंबना आहे.

स्वतःला शाकाहारी म्हणवणारे अनेक लोक मांसाहाराला हिंसा म्हणतात. पण पिकांवर फवारलेल्या विषामुळे कित्येक निष्पाप जीव मरतात तेव्हा ती हिंसा दिसत नाही.

कारण त्या जीवांना चेहरा नाही. आवाज नाही. भावना आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत.

पण म्हणून त्यांचं जीवन कमी महत्त्वाचं होत नाही.

खरं पाहिलं तर आपल्या ताटातलं जवळपास कोणतंच अन्न पूर्णपणे हिंसामुक्त नसतं.

धान्य पिकवताना जीव मरतात. भाज्या उगवताना जीव मरतात. रस्ते बांधताना परिसंस्था नष्ट होतात. मोठ्या शहरांसाठी जंगलं संपतात.

म्हणून प्रश्न फक्त “कोण काय खातो?” हा नाही.

प्रश्न असा आहे:

आपण निसर्गाशी किती प्रामाणिक आहोत?

आपण गरजेपुरतं घेतो की लोभाने?

आपण सहजीवन मानतो की मालकी?

कारण निसर्गात पूर्ण अहिंसा कदाचित शक्यच नाही.

पण संवेदनशीलता शक्य आहे. संतुलन शक्य आहे. अनावश्यक क्रौर्य टाळणं शक्य आहे.

आज मोठी समस्या मांसाहार किंवा शाकाहार नाही.

समस्या आहे:

निसर्गापासून तुटण्याची,

लोभाची,

संवेदनाशून्यतेची,

आणि स्वतःला बाकी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची.

जात, धर्म, ताट आणि श्रेष्ठत्व यापेक्षा विचार बदलण्याची जास्त गरज आहे.

25/05/2026

धर्म आणि आहार हा विषय आज इतका भावनिक झाला आहे की लोक अनेकदा विचार करण्याऐवजी थेट प्रतिक्रिया देतात. कोण शाकाहारी, कोण मांसाहारी, कोण पवित्र, कोण अपवित्र… जणू माणसाचा स्वभाव नाही तर त्याच्या ताटावरून त्याची किंमत ठरवली जाते.

पण खरंच आहाराचा अध्यात्माशी इतका संबंध आहे का?

मानवाच्या सुरुवातीच्या इतिहासाकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. त्या काळात “हे खावे की नाही?” हा नैतिक प्रश्न नव्हता. प्रश्न फक्त एवढाच होता की “आज खायला मिळणार काय?”

माणूस जे मिळेल ते खात होता. फळे, कंदमुळे, मध, मासे, प्राणी… जगण्यासाठी जे आवश्यक होते ते.

त्या वेळी शाकाहार-मांसाहार हा धर्माचा विषय नव्हता. कारण उपाशी माणूस आधी पोट भरतो, तत्त्वज्ञान नंतर शोधतो.

मग शेती आली.

आणि खरं पाहिलं तर शेतीने फक्त अन्न निर्माण केलं नाही. शेतीने माणसाला “निवड” दिली.

धान्यसाठे तयार झाले. माणूस एका जागी स्थिर झाला. गावं निर्माण झाली. उद्याचं अन्न साठवून ठेवणं शक्य झालं. पहिल्यांदाच माणूस रोज मृत्यूच्या भीतीतून थोडा बाहेर आला.

आणि तेव्हाच तो विचार करू लागला: “काय खावं?” “काय टाळावं?” “काय पवित्र?” “काय अपवित्र?”

निवड आली की नैतिकता जन्म घेते.

मग पुढे उपास आले, काही पदार्थ पवित्र झाले, काही अपवित्र झाले, काही दिवस खास झाले. हळूहळू आहाराला धर्माशी जोडले गेले.

पण इथे एक प्रश्न विचारायलाच हवा.

जर परब्रह्म निर्गुण, निराकार आणि सर्वव्यापी असेल, तर त्याला आपल्या ताटात काय आहे याने खरंच फरक पडतो का?

जर देवानेच निसर्ग निर्माण केला असेल, तर त्या निसर्गातील अन्नसाखळीही त्याचाच भाग नाही का?

निसर्गात प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर जगतो. सिंह हरण खातो म्हणून तो अधार्मिक होत नाही. पक्षी किडे खातात म्हणून ते अपवित्र होत नाहीत.

आणि शेती करणारा माणूस हे सर्वात चांगल्या प्रकारे समजू शकतो.

कारण शेती माणसाला पुस्तकातलं नाही, तर प्रत्यक्ष जीवन शिकवते.

शेतात प्रत्येक जीवाचा वाटा असतो.

गांडुळे आहेत म्हणून माती जिवंत आहे. मधमाश्या आहेत म्हणून परागीभवन आहे. पक्षी आहेत म्हणून संतुलन आहे. गाई आहेत म्हणून शेण आहे. सूक्ष्मजीव आहेत म्हणून अन्न उगवतं.

“जीवो जीवस्य जीवनम्” हे शेतकऱ्यासाठी तत्त्वज्ञान नसून रोजचं वास्तव असतं.

म्हणूनच शेतकरी अनेकदा जीवनाकडे “पाप-पुण्य” पेक्षा “संतुलन” म्हणून पाहतो.

आज अनेक लोक मांसाहार, कोंबडीपालन, शेळीपालन किंवा मत्स्यपालनाकडे फक्त हिंसा म्हणून पाहतात. पण निसर्ग इतका सरळ नाही.

शेती करतानाही:

नांगरताना जीव मरतात,

कीटकनियंत्रणात जीव मरतात,

जमीन तयार करताना परिसंस्थेत बदल होतात.

मग फक्त एका प्रकारच्या मृत्यूला “पाप” म्हणणं आणि बाकीचं दुर्लक्षित करणं हे वास्तवापासून दूर जाणं ठरतं.

लोक म्हणतात: “झाडांना संवेदना नसतात.” “किड्यांना वेदना नसतात.”

पण विज्ञान सांगतं की झाडंही प्रतिसाद देतात. संवाद करतात. वातावरणातील बदल ओळखतात. संपूर्ण निसर्ग जिवंत आहे.

म्हणून प्रश्न “कोणता जीव?” हा नसून “कसा दृष्टिकोन?” हा आहे.

आज मोठी समस्या मांसाहार किंवा शाकाहार नाही. समस्या आहे निसर्गापासून तुटण्याची.

शहरातला माणूस दूध पितो पण गाय कशी जगते हे पाहत नाही. अंडी खातो पण कोंबड्या कशा वाढवल्या जातात हे माहिती नसतं. भाज्या खातो पण माती जिवंत आहे की मृत हे समजत नाही.

शेतीत मात्र वास्तव लपवता येत नाही.

जन्म दिसतो. मृत्यू दिसतो. भूक दिसते. संतुलन दिसतं.

म्हणून एखादा शेतकरी जर:

गाईंची प्रेमाने काळजी घेत असेल,

कोंबड्यांना पिंजऱ्यात न ठेवता मोकळं जगू देत असेल,

शेती, पशुपालन आणि मत्स्यपालन यांना निसर्गचक्राचा भाग म्हणून पाहत असेल,

तर त्याला फक्त “पाप” म्हणून पाहणं योग्य ठरत नाही.

कारण निसर्ग स्वतः पूर्ण अहिंसक नाही. पण तो अनावश्यक क्रूरही नाही.

फरक इथेच आहे.

लोभ आणि संवेदनाशून्यता ही समस्या आहे. निसर्गचक्र नाही.

आज अनेक लोक शाकाहार निवडतात कारण:

प्राण्यांबद्दल संवेदनशीलता,

पर्यावरण,

आरोग्य,

औद्योगिक पशुपालनातील क्रौर्य

हे सगळे वैध मुद्दे आहेत.

पण हे नैतिक आणि पर्यावरणीय मुद्दे आहेत. ते थेट अध्यात्माचे पुरावे नाहीत.

कारण आपण आजूबाजूला पाहतोच: काही शाकाहारी लोक अत्यंत क्रूर, भ्रष्ट आणि अहंकारी असतात. आणि काही मांसाहारी लोक अतिशय संवेदनशील, शांत आणि मदतीला धावून जाणारे असतात.

म्हणजे माणसाची किंमत त्याच्या ताटाने नाही, तर त्याच्या वर्तनाने ठरते.

खरी समस्या आहारात नसते. समस्या श्रेष्ठत्वाच्या भावनेत असते.

“मी हे खात नाही म्हणून मी जास्त पवित्र” हा विचार अनेकदा अध्यात्मापेक्षा अहंकाराच्या जवळ जातो.

खरे अध्यात्म माणसाला अधिक जागरूक, अधिक करुणामय आणि अधिक प्रामाणिक बनवत असेल तर त्याला अर्थ आहे.

बाकी आपण काय खातो यापेक्षा आपण कसे जगतो, निसर्गाशी कसे वागतो आणि इतर जीवांशी किती संवेदनशीलतेने वागतो हे जास्त महत्त्वाचे आहे.

24/05/2026

अध्यात्म म्हणजे नेमकं काय?

मंदिरात जाणं, पूजा करणं, उपास करणं, मंत्र म्हणणं… की जीवनाकडे पाहण्याची एक पद्धत?

मला अनेकदा वाटतं की खऱ्या अध्यात्माचा संबंध धर्मापेक्षा निसर्गाशी जास्त आहे.

कारण निसर्गात कुठेही दिखावा नाही. तिथे संतुलन आहे, परस्परावलंबन आहे आणि एक शांत प्रामाणिकपणा आहे.

मी शेती करताना हे रोज पाहतो.

माझ्याकडे गाई आहेत. पण मी त्यांना दूध देणारी मशीन समजत नाही. मी त्यांची काळजी घेतो, त्यांना चांगलं अन्न देतो, त्यांना मोकळेपणाने जगू देतो. त्यांची वासरं माझ्यासमोर मोठी झाली आहेत. त्यांना माझी सवय आहे, विश्वास आहे.

मी त्यांची निगा राखतो आणि त्या माझी.

हे व्यवहाराचं नातं नाही. हे सहजीवन आहे.

माझ्याकडे कोंबड्याही आहेत. पण एकही पिंजऱ्यात नाही. त्या मोकळ्या फिरतात. त्यांच्या नैसर्गिक पद्धतीने जगतात. त्यातली एखादी जखमी झाली तर मी “उद्या कापणारच आहे मग औषध कशाला?” असं म्हणत नाही. कारण जीवनाचा उपयोग करायचा म्हणजे संवेदनशीलता सोडायची असा अर्थ होत नाही.

मला वाटतं आधुनिक जगात मोठी समस्या “मांसाहार” किंवा “शाकाहार” नाही. समस्या आहे नातं तुटण्याची.

आज माणूस दूध पितो पण गाय पाहत नाही. अंडी खातो पण पक्षी कसे जगतात हे पाहत नाही. भाज्या खातो पण माती मरत चालली आहे हे जाणवत नाही.

निसर्गापासून जितका माणूस दूर गेला, तितकं अध्यात्मही कृत्रिम होत गेलं.

खरं पाहिलं तर शेतीच सर्वात मोठा अध्यात्माचा धडा शिकवते.

शेतात प्रत्येकाचा वाटा असतो.

किडे आहेत म्हणून पक्षी आहेत. पक्षी आहेत म्हणून संतुलन आहे. गांडुळे आहेत म्हणून माती जिवंत आहे. मधमाश्या आहेत म्हणून परागीभवन आहे. गाई आहेत म्हणून शेण आहे. झाडं आहेत म्हणून सावली आहे.

निसर्गात काहीच वेगळं नाही. सगळं जोडलेलं आहे.

म्हणून मला “जीवो जीवस्य जीवनम्” हे वाक्य क्रूर वाटत नाही. ते वास्तव वाटतं.

जीवन हे जीवनावरच उभं आहे.

पण त्याचा अर्थ निर्दयता नाही.

निसर्गात भक्षण आहे, पण अनावश्यक क्रौर्य नाही. फक्त माणूसच असा जीव आहे जो गरजेपेक्षा जास्त शोषण करू शकतो.

म्हणून खरा प्रश्न “काय खातो?” हा नसून “कसं जगतो?” हा आहे.

आपण ज्या जीवांवर जगतो त्यांच्याबद्दल आदर आहे का? आपण निसर्गाला फक्त वापरतो की त्याची काळजीही घेतो? आपण जमिनीला जिवंत ठेवतो की फक्त उत्पादन काढतो?

माझ्यासाठी अध्यात्म म्हणजे हाच समतोल.

मी निसर्गाची निगा राखतो आणि निसर्ग माझी.

शेतीमध्ये मला मंदिरापेक्षा जास्त अध्यात्म दिसतं. कारण इथे प्रत्येक गोष्ट खरी आहे. माती खोटी नाही. भूक खोटी नाही. पाऊस खोटा नाही. जन्म आणि मृत्यूही खोटे नाहीत.

आणि कदाचित म्हणूनच निसर्गाच्या जवळ राहणारा माणूस देवावर कमी बोलतो, पण जीवनाला जास्त समजतो आणि कदाचित इथेच आधुनिक धर्म आणि खऱ्या अध्यात्मामधला फरक स्पष्ट दिसतो.

एका बाजूला निसर्ग आहे. शांत, प्रामाणिक, कोणताही दिखावा नसलेला.

दुसऱ्या बाजूला आजचा धार्मिक बाजार आहे.

आज अध्यात्मापेक्षा धर्म हा अनेक ठिकाणी मोठा उद्योग बनला आहे.

मंदिरं श्रद्धेपेक्षा अर्थव्यवस्थेची केंद्रं बनताना दिसतात. देव सर्वांसाठी समान आहे असं सांगितलं जातं, पण मंदिरात व्हीआयपी लाईन वेगळी असते. पैशाने “जलद दर्शन” मिळतं. गरीब भक्त रांगेत उभा राहतो आणि श्रीमंत थेट गाभाऱ्यात जातो.

जर देवासमोर सर्व समान असतील, तर देवापर्यंत पोहोचण्यासाठी पैशाची गरज का पडावी?

श्रद्धा हळूहळू व्यवहारात बदलते:

देणगी दिली तर काम होईल

नवस केला तर देव प्रसन्न होईल

अभिषेक केला तर संकट जाईल

मग देव हा विश्वचेतना न राहता एखाद्या अधिकाऱ्यासारखा बनतो ज्याला खुश ठेवावं लागतं.

काही ठिकाणी तर लोक स्वतःचे केस देवाला अर्पण करतात. पण नंतर त्याच केसांचा कोट्यवधींचा व्यापार होतो. श्रद्धा आणि व्यवसाय इतके एकत्र मिसळले जातात की लोक प्रश्न विचारणंही थांबवतात.

त्याचप्रमाणे आज अनेक तथाकथित बाबा आणि गुरु अध्यात्मापेक्षा ब्रँड जास्त वाटतात.

एकीकडे वैराग्य, साधेपणा आणि अध्यात्माच्या गोष्टी बोलल्या जातात, आणि दुसरीकडे:

साबण,

शाम्पू,

टूथपेस्ट,

अगरबत्ती,

औषधं,

खाद्यपदार्थ,

चॅनेल,

मोठमोठे उद्योग

उभे राहतात.

समस्या व्यवसाय करण्यात नाही. व्यवसाय चुकीचा नाही.

पण प्रश्न प्रामाणिकतेचा आहे.

जर एखादा उद्योगपती व्यवसाय करतो, तर तो स्पष्टपणे म्हणतो “मी व्यवसाय करतो.”

पण जेव्हा अध्यात्म, मोक्ष, श्रद्धा आणि भीती यांच्या नावाखाली बाजार उभा राहतो, तेव्हा लोकांच्या भावनांचा वापर होऊ लागतो.

आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे: लोक प्रश्न विचारणं बंद करतात.

कारण त्यांना शिकवलं जातं: “श्रद्धा ठेवा.” “प्रश्न विचारू नका.” “शंका म्हणजे पाप.”

पण खरं अध्यात्म कधीच प्रश्नांना घाबरत नाही.

सत्याला संरक्षणाची गरज नसते.

जर एखादी श्रद्धा प्रश्न विचारताच कोसळत असेल, तर ती सत्य नसून मानसिक आधार असतो.

म्हणून आज सर्वात मोठी गरज धर्म वाढवण्याची नाही. गरज आहे जागरूकता वाढवण्याची.

कारण निसर्गात राहणारा शेतकरी अनेकदा पुस्तकं न वाचताही जीवन समजतो. आणि दुसरीकडे मोठमोठे धार्मिक कार्यक्रम करणारा माणूसही आतून भयभीत आणि अस्वस्थ असू शकतो.

खरं अध्यात्म कदाचित इतकंच आहे: जीवनाशी प्रामाणिक राहणं. निसर्गाशी जोडलेलं राहणं. आणि कोणत्याही भीतीशिवाय सत्याकडे पाहण्याची हिंमत ठेवणं.

Address

Gut No 12, Girnera Tanda
Aurangabad
431103

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm

Telephone

+919765402699

Alerts

Be the first to know and let us send you an email when AllGanic Farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AllGanic Farm:

Share